Return to site

शांघाय, (चीन) विमानतळावर अडकलेला 14 वर्षीय विराज

किरीटनामा – 6

August 24, 2019

चीन, देशातील शांघाय विमानतळावर अडकून पडलेल्या 14 वर्षाच्या विराज या मुलाची ही सत्य घटना. त्याला ना कोणी मार्गदर्शक किंवा मदत करणारा. त्यांचे मुंबईस्थित कुटुंबिय फारच गोंधळून गेले. एकतर भाषेची अडचण त्यात एकटा व घरच्यांशी संपर्क होत नव्हता. अश्या वेळी कोणाचीही अवस्था बिकट होणे स्वाभाविक आहे.

          ठाण्याच्या शहा कुटुंबियांच्या हातात केवळ आपला मुलगा परत घरी येण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करणेच एवढेच शक्य होते.

          ही घटना केवळ करमणूक म्हणून घेण्याची नव्हेच. परंतु, अतिशय गंभीरतेने विचार करण्यासारखी आहे. कारण अशी घटना कोणाच्याही मुलांबाबत होऊ शकते.

          जागतिक विमान कंपन्याच्या विदेश किंवा  स्थानिक प्रवासासाठी एक नियमावली आहे. ती पण आपणा सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे.

  • 12 वर्षाखालील बालकांसाठी त्यांच्यासह एक प्रौढ व्यक्ती असावी.
  • त्यांचे तिकीट घेतानाच त्यांच्या बरोबर कोण जाणार आहे त्याचे नाव कळविणे.
  • जर मुलगा/मुलगी 12 ते 18 वर्षे वयाची असतील तर ते एकटे प्रवास करू शकतात. परंतु त्यांना जाताना (Departure) विमानतळावर कोण सोडणार तसेच तिथे (Arrival) त्याला कोण घ्यायला येणार याची सर्व माहिती संबंधित Airlines च्या विमानतळ अधिकाऱ्यांना कळविणे आवश्यक आहे.
  • पालकांशिवाय इतर कोणी जात असेल तर लेखी स्वरुपात अधिकारपत्र (Authorisation letter) देणे आवश्यक आहे.
  • अश्या प्रकारच्या हवाई प्रवासासाठी Airlines ची परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • अश्या प्रकारे जो पालक म्हणून त्याला विमानतळावर सोडण्यासाठी व परत आणण्यासाठी जाणार आहे त्याने आपल्या मुलाला संबंधित Airlines च्या योग्य त्या कर्मचाऱ्यांच्या हवाली करावयाचे असते.
  • विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासात बऱ्याच संबंधित Airlines कंपन्या अश्या स्वरूपाच्या आवश्यकता पूर्ण न झाल्यास लहान मुलांना एकटे नेण्यास नकार देतात.

“विराज शहाचा हा कथावृतांत/अनुभव”

11 ऑगस्टला अलिबाग येथे असताना संध्याकाळी 5.45 वाजता माझ्या शाळेतील मित्र श्री. रजनीकांत शहा याचा फोन आला. तो असा होता.

  • तो म्हणाला की माझ्या बहिणीचा 14 वर्षाचा मुलगा शांघाय विमानतळावर एका अडचणीत सापडला आहे.
  • विराज शहा हा एका आंतरराष्ट्रीय गणिताच्या शिक्षण/स्पर्धेसाठी शांघाय, चीन येथे गेला आहे.
  • 6 जुलै, 2019 पासून शिकवणी/कोर्स सुरु होणार होता.
  • कोर्सचा कालावधी संपल्यावर संघटकांनी विराजला शांघाय विमानतळावर आणून पोहचवले.

जेव्हा विराज Air India च्या काऊंटरवर गेला तेव्हा तेथील स्थानिक कर्मचारी/Agency च्या कर्मचाऱ्यानी त्याला अजिबात जुमानले नाही. अर्थात त्याला प्रवास करण्यास नकार दिला

  • तू एकटा कसा काय असे संबंधित कर्मचाऱ्यांनी चेक इन काऊंटरवर विराजला विचारले.
  • तुझ्या बरोबर शांघाय विमानतळावर सोडण्यास आलेली अधिकृत व्यक्ती कोण आहे.
  • अधिकृत केलेली कागदपत्र कुठे आहेत?
  • त्याला विमान प्रवासासाठी आवश्यक ते अनुमती पत्रक (Boarding Pass) देण्यास नकार दिला.
  • केवळ 14 वय वर्षे असलेला विराज अक्षरशः एकाकी होता, चायनिज भाषा तर त्याला कळत नव्हती. त्यामुळे परस्परांशी बोललेले कळत नव्हते. सगळच कठीण झाले.
  • मोबाईल/इंटरनेटवरून काही केल्या त्याचा मुंबईतील पालकांशी संपर्क होत नव्हता.
  • विराजचे भारतीय मोबाइल सिम कार्ड तेथे कार्यरत नव्हते, त्यामुळे तो अतिशय गोंधळून गेला.
  • शेवटी अगदी त्याचे नशीब बलवत्तर म्हणूनच एका सहप्रवाश्याच्या सहाय्याने त्याने आपली अवस्था त्याच्या आई बाबांना म्हणजे डॉ. सोनल शहा व श्री. स्मितेश शहा यांना कळविली.

त्यांनी स्थानिक एअर इंडीयाच्या कर्मचाऱ्यांशी, आपल्या जवळच्या नातेवाईकांशी व मित्रांशी संपर्क साधला. त्याचवेळेस माझ्या शाळेच्या मित्राने (एम. एम. पुपिल्स ओन स्कूल, खार, मुंबई) मला फोन करून मदतीची विनंती केली आणि मग त्यांच्याकडून सर्व तपशील घेतला.

          मी नागरी उड्डाण मंत्रालयाचे श्री. हरदीप पुरी यांचे स्वीय सचिव श्री. यशपाल दिवाण यांना सदर घटनेची माहिती दिली

मी तत्परतेने एअर इंडीयातील माझे परिचित असलेल्या काही संबंधित व Civil Aviation मंत्रालयाशी बोलणे केले. माझे एअर इंडीयाचे संचालक श्री. मुकेश भाटीया आणि त्यांचा सहाय्यक कर्मचारी व नागरी विमान मंत्रालयाचे मंत्री व कर्मचारी यांच्या बरोबर संपर्क केला

  • श्री. मुकेश भाटीयांना काय त्रुटी आहेत ते बरोबर समजले व त्यांनी मला मार्ग काढण्यासाठी वेळ मागितला. काही वेळातच श्री. मुकेश भाटीया यांचा फोन आला की, विराजच्या पालकांना सांगून त्यांच्याकडून विराजला शांघाय ते मुंबई प्रवासास परवानगी द्यावी व जो कोणी त्याला मुंबई विमानतळावर घ्यायला येणार आहे त्याच्या नावाचे अधिकार पत्र (Authorised Letter) Air India च्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या नावे पाठविण्यास सांगितले.
  • मी, ताबडतोब हा निरोप श्री. रजनीकांत यांना कळविला व विराजच्या पालकांना अधिकार पत्र, मग ते हाताने लिहिलेले असले तरी चालेल व ते Whatsapp ने श्री. रजनीकांत यांना पाठविण्यास सांगितले. विराजची आई डॉ. श्रीमती. सोनल शहा यांनी तशा प्रकारचे विनंती पत्र लिहून श्री. रजनीकांत यांना व मला Whatsapp वर पाठविले व मग मी ते श्री. मुकेश भाटीया यांना पाठविले.
  • एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी व माझे मित्र श्री. मुकेश भाटीया यांनी दाखविलेली तत्परता व संवेदनशीलता हे खरचं कौतुकास्पद आहे. त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन एकही क्षण वाया न घालवता जी निरोपाची देवाण-घेवाण संबंधित अधिकाऱ्यांशी केली व प्रत्येक वेळी मला कळवित होते.
  • एअर इंडियाचे स्थानिक चिनी कर्मचारी विराजची योग्य ती काळजी घेत आहेत असे थोड्या वेळातच श्री. मुकेश भाटीया यांनी मला कळविले.

श्री. मुकेश भाटियांचा संदेश

  • विराजला विमानप्रवास करण्यासाठी आवश्यक असलेले अनुमती पत्र (Boarding Pass) देण्यात आले आहे. असे श्री. रजनीकांत यांनी मला कळविले.
  • प्रत्येक मिनिटा मिनिटाला मी श्री. रजनीकांत, विराजचे पालक, श्री. मुकेश भाटीया व नागरी उड्डाण मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा करत होतो.
  • विराज जो पर्यंत विमानात चढत नव्हता व विमान उड्डाण करत नव्हते तो पर्यंत रजनीकांत, विराजचे पालक व मी कोणाचेच चित्त थाऱ्यावर नव्हते. 
  • अखेर संध्याकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी विराजला Boarding Pass दिला असे रजनीकांत यांनी कळविले.
  • रात्री साधारण 9 च्या दरम्यान विराजच्या विमानाने उड्डाण केले असे त्यांच्या पालकांनी मला कळविले. 
  • दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार सकाळी शांघाय-मुंबई हे विमान मुंबईला उतरले.

पालकांचा संदेश

  • मुंबई विमानतळावर विराजचे वडील आपल्या मुलाला घेण्यासाठी केव्हाच पोहोचले होते.
  • 12 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.50 वाजता विराज ठाण्यातील आपल्या घरी सुखरूप पोहचला.

“परंतु, काही बोधक विचारांसह, शेवट गोड झाला”

यातून प्रत्येकाने बोध घेण्यासारखे

  • विराजला जर शांघायहून प्रवासच करू दिला नसता तर?
  • हा मुलगा कुठे असता?
  • कोणताही संपर्क नाही, निरोप नाही, भाषेची अडचण त्यात हा फक्त 14 वर्षांचा.
  • भारतीय मोबाईलचे सिमकार्ड तिथे कार्यरत नाही.
  • पालकांना आपल्या मुलाचे काय होईल अशी काळजी वाटण स्वाभाविकच आहे.
  • कधीकधी स्पर्धेत निवड झाली या आनंदात त्यांची तयारी करताना उडालेली घाई, शिक्षण/स्पर्धा आयोजित करणाऱ्या संघटना, प्रवासी कंपन्या यांच्या सारख्यासारख्या सूचनांमुळे, सुरक्षासाठी असलेल्या सरकारी नियमांची, विमाकंपन्याच्या सूचनांची अगदी प्राथमिक आवश्यक गोष्टींकडे पण दुर्लक्ष होते कारण असे प्रसंग काय नेहमीच येत नसतात. पण जर आपल्या मुलांवर अशी वेळ आली तर काय करावे लागते त्यासाठी हा प्रयत्न.
  • वास्तविकपणे जर बालक 12 वर्षे वयाच्या आत असेल तर त्याच्या सोबत पालक असायलाच हवे. हा प्राथमिक नियम आहे. जर तो त्यापेक्षा मोठा म्हणजे 12 ते 18 वयापर्यंत असेल तर त्याला विमानतळावर सोडण्यासाठी तसेच परदेशी उतरवून घेण्यासाठी कोण जाणार आहे. याची माहिती तिकीट काढावयाच्या वेळेसच विमान कंपनीला देणे आवश्यक आहे व आपला पाल्य एअर लाईन्सच्या योग्य कर्मचाऱ्याच्या ताब्यात देणे जरुरीचे असते. कारण जर काही प्रसंग/अपघात किंवा हवाई/नैसर्गिक संकटामुळे, विमानांचे वेळापत्रक बिघडल्यास परदेशात काय करेल. यासाठीच सरकारी सुरक्षा नियम केले आहेत ते अवश्य पाळले पाहिजेत.

 

असच जर काही झाल तर पालकांनी गोंधळून न जाता त्यांनी संबंधित योग्य त्या अधिकारी, कार्यालये यांच्याशी संपर्क करणे आवश्यक आहे.

 

विराज शहा हा खरोखरच बुद्धिमान मुलगा आहे. त्याला गणितामध्ये अनेक प्रकारच्या शिष्यवृत्या (Scholorship) मिळाल्या आहेत. येत्या सप्टेंबर मध्ये तो अमेरिकेला जाणार आहे.

 

          माझ्या तर्फे या तरुण होतकरू गणितज्ञाला त्याच्या पुढील यशस्वी प्रगतीसाठी मन:पूर्वक सदिच्छा!

विराजसह त्यांच्या ठाणे येथील कुटुंबीयांसह डॉ. किरीट सोमैया - 13 ऑगस्ट 2019